इन्शुरन्स श्रेष्ठ दान

आपले पैसे दान करण्यासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता?


माझ्यामते दान करण्याचा सर्वात चांगला मार्ग स्वतःचा आणि कुटुंबाचा इन्शुरन्स काढणे.

हे उत्तर अपेक्षित नसले तरी पूर्ण वाचा हि विनंती.

आपण दान का करतो? एखाद्या गरजवंताला मदत व्हावी, एखाद्या चांगल्या कामाला आपला हातभार लागावा आणि कितीही नाही म्हंटले तरी पुण्य कमावण्यासाठी. नाहीका? मला वाटते इन्शुरन्सचा देखील हाच उद्देश आहे. फरक एवढाच आहे कि ज्या गरजवंताला आपण मदत करतो, भविष्यात तोच गरजवंत आपण वा आपले कुटुंबही असू शकतो.

इन्शुरन्स काय आहे, हे सोप्या पद्धतीने समजून घेऊ.



एका गावात १०० घरे आहेत. प्रत्येक घर जवळजवळ सारख्याच पद्धतीचे आहे आणि आतल्या सामानासहित एकूण एक लाख रुपयांचे आहे. मागील काही दशकांपासूनचा इतिहास पाहिला तर दर वर्षी या गावातील कुठलीही २ घरे आगीमुळे किंवा वादळाच्या तडाख्यात नष्ट होतात.

नष्ट झालेली घरे पुन्हा बांधायला त्या २ दुर्देवी कुटुंबाना १ लाख रुपये खर्च येतो. म्हणजे एकूण २ लाख रुपये लागतात. त्या कुटुंबांचे आर्थिक गणित पुढील काही वर्षांसाठी बिघडून जाते. हे असे वर्षानुवर्षे घडत आहे.

त्या गावातील काही हुशार मंडळींनी यावर इन्शुरन्स हा उपाय काढला. त्यांनी ठरवले, कि जर गावातल्या २ कुटुंबाना २ लाख रुपये खर्च येणारच आहे, तर १०० घरांमधून २ लाख / १०० असे २००० हजार रुपये दर वर्षी गोळा केले तर या पीडित कुटुंबाना मोठी आर्थिक झळ बसणार नाही.

अशा पद्धतीने दर गुढीपाडव्याला प्रत्येक कुटुंब २००० हजार रुपये जमा करते आणि जेव्हाही कोणत्याही कुटुंबावर आपत्ती येते त्या कुटुंबाला याच रकमेतून आधार दिला जातो.

तसे पाहिले तर सुरक्षित राहिलेली ९८ कुटुंबे हे एक प्रकारचे दानच करीत आहेत. काही सुदैवी कुटुंबाना तर त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधी या इन्शुरन्स आधाराची गरज लागली नाही कारण त्यांच्यावर कधी आपत्तीच आली नाही. आता ही चांगली का वाईट गोष्ट?

----

पुरातन काळी समाजामध्ये इन्शुरन्स सारखी सिस्टीम असती, तर नक्कीच इन्शुरन्स चा पुण्य देणाऱ्या गोष्टींमध्ये उल्लेख झाला असता असे मला वाटते.

त्यामुळे, आपल्याला दान करण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा आपण स्वतः योग्य टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स घेतला नसेल तर तो घ्यावा. मनोमन हा इन्शुरन्स मला कधी लागूच नये अशी इच्छा धरावी आणि त्यानुसार आपली, कुटुंबीयांची आणि मालमत्तेची काळजी घ्यावी. जर प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेची योग्यप्रकारे व्यवस्था केली तर एकप्रकारे समाजाचीच काळजी घेतल्यासारखे आहे. आणि इन्शुरन्स असेल तर मिळणारी सुरक्षितता ही नक्कीच एक सुखद भावना आहे. आधुनिक काळात इन्शुरन्स कंपन्यांच्या कामकाजावर IRDAI सारख्या सरकारी संस्थांचे बारीक लक्ष असते आणि या कंपन्या गोळा झालेला अतिरिक्त निधी परत राष्ट्रउभारणी साठीच वापरतात.

तळटीप: हेल्थ इन्शुरन्स खूप महाग वाटत असतील तर त्यावर सुपर टॉप अप, पर्सनल ऍक्सीडेन्ट असे पर्याय देखील असतात. संपूर्ण कव्हर नसले तरी किमान आर्थिक कणा मोडणार नाही इतपत व्यवस्था करता येऊ शकते. बाकी त्यापलीकडे देवाची इच्छा. इन्शुरन्स आणि गुंतवणूकीची सरमिसळ करू नका आणि गरज पडल्यास चांगल्या सल्लागाराची मदत घ्या. यासंदर्भात काही माहिती हवी असल्यास उदा.इन्शुरंस प्लॅन्स, प्रीमियम, त्यातल्या सुविधा इत्यादी मला संपर्क करू शकता.

टिप्पण्या

Popular Articles on This Site

मुलांच्या शिक्षणाची तरतूद

निवृत्त होण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हे कसे ठरवायचे?